सुख
प्रत्येक माणूस सुखासाठी झटत असतो पण सुख म्हणजे नेमके काय हेच माहीत नसते .बर्याच जणांना वाटते हाती भरपूर पैसा बंगला गाड्या नोकर चाकर म्हणजे सुख व ते मिळवण्यासाठी जीवाचा आटापिटा करतात .काहींना वाटते हाती मोठे पद म्हणजेच सुख . काहींना वाटते आपली मुलेबाळे व्यवस्थित मार्गाला लागले म्हणजे सुख.म्हणजे मोठमोठ्या गोष्टीत सुख पाहिले जाते पण जेव्हा स्वत:च्या शरीराला हानी पोहचते की जी जीवावर बेतणारी असते .अतोनात यातना होतात की ज्या सहन करण्या पलिकडच्या असतात तेव्हा माणूस आपल्या जवळ असलेले किंवा मिळवलेले घर बंगला गाडी नोकर चाकर पती पत्नी मुले बाळे पद हे सर्व विसरतो व ज्या यातना होता आहेत त्या कशा बर्या होतील व त्या बर्या व्हाव्यात व त्या यातनांतून सुटका व्हावी अशी अपेक्षा असते व त्या यातनातून सुटका झाली की सुख अशी भावना तयार होते पण जेव्हा यातना नव्हत्या तेव्हा मात्र इतर गोष्टींमध्ये सुख शोधत असतो पण यातना सुरु झाल्या की मृगजळाप्रमाणे बाकी गोष्टी विसरतो व आपल्याला बरे वाटेल यातनांतून ते खरे सुख असे वाटायला लागते म्हणून सुख म्हणजे नेमके काय हे माणसाला समजले की मग बरेच प्रश्न आपोआप सुटतात .खरे सुख आपल्याजवळच असते पण आपले त्याकडे लक्ष नसते व त्या सुखाला आपण पारखे होतो.आपले निरोगी शरीर म्हणजेच सुख .दोन वेळचे आनंदाचे खाणे व रात्री गाढ झोप लागणे म्हणजेच सुख.इतर जेव्हा दु:खी असतात तेव्हा पैशारुपाने शब्दरूपाने त्यांना धीर देऊन त्यांच्या चेहर्यावर आनंद आणणे म्हणजेच सुख .पावसात मनोसक्त भिजणे .उन्हाळ्यात नदीत तलावात पोहणे .मित्रांबरोबर गप्पागोष्टीत रमून जाणे व खळखळून हसणे .जे ताटात आहे ते म्हणजे परब्रम्ह असे म्हणून सेवन करणे .आपल्या हातून सेवा घडणे .एकटे जेव्हा जेव्हा असतो तेव्हा तो परमेश्वर आपल्या बरोबरच आहे अशी भावना ठेवून डोळे मिटून त्याचे स्मरण करणे माणजेच सुख .जेथे जाऊ तेथे स्वच्छता ठेवणे .प्रामाणिकपणे वागणे अशा अनेक छोट्या गोष्टीत सुख दडलेले असते पण आपले लक्ष छोट्या गोष्टीत नसते तर मोठ्या गोष्टीतच सुख असते असे वाटते.आपल्याला एखादे दु:ख जेव्हा येते तेव्हा आपल्या दु:खापेक्षा इतर कुणाला किती मोठे दु:ख आहे हे बघून आपले दु:ख लगेचच सुखात परिवर्तित होते म्हणून सुख व दु:ख हे नेमके कशात आहे हे कळले की मग आपण नक्की सुखी आहोत असे वाटायला लागते .बघा पटतं का?
प्रा. दगा देवरे
Comments
Post a Comment